Wednesday, August 15

आज

देशाला म्हणावे माता
बांधवाना घालून लाथा
ही मुले तिच्याच पोटा
आपण कशी?

देशास मातेचा स्त्री धर्म
स्त्री मात्र पुरुषी मर्म
साधून तिचेच वर्म
तिचाच घात !

संस्कृतीचे गुणगान
शस्त्राने भरले म्यान
कमरेस मिरवी लावून
छाती ठोक !

अहंकार पुरातन धर्माचा
जो धर्म खरा कृषिवलाचा
फासावर बळी मात्र त्याचा
जातो रोज !

कर्मकांड जातीपाती
धमन्यात जणू नांदती
तलवारी उगारल्या जाती
क्षणार्धात !

पशूला देवपण
दगडा पूजास्नान
माणसा मात्र शोषण
ठरलेलेच !

वेगळ्या विचारांची कोंडी
अवघे भोगांच्या तोंडी
शोषक शोषितांच्या झुंडी
वृद्धिंगत !

बाह्य प्रगतीचा देखावा
आत हिंस्र पशूच पोसावा
असा समाज कसा जावा
भविष्याकडे?

माणसाचे एक एक संघटन
विघटनकारक तत्वातून
अनुभव हाचि त्रिकाळातून
आज बळ धरे !

आदिमतेचेच अंतरी गर्व
भविष्य-स्वप्नांचे रेखती पर्व
मनुष्यतेची धरून वाट सर्व
जमेल का?

भूतकाळ स्वर्णरंगी रंगवती
भविष्यास तेजरंगे माखती
वर्तमानास मात्र धास्ती
नासण्याची !

देशकार्या धर्म म्हणताना
देश-देव मानता संकल्पना
क्षणोक्षणी बिंबावी मना
मानवता होय !

- प्रदीप वैद्य

Sunday, April 1

शहाणपणाची भाषा

अनेकदा असं असतं की एखादा शहाणपणाचा सल्ला, सुविचार किंवा किस्सा हा वेगवेगळी रूपं घेऊन आपल्यासमोर येत असतो. आपल्याला शाळेत शिक्षकांनी काही सांगितलं असतं, घरचे किंवा नातेवाईक एक सांगत असतात, उजव्या किंवा डाव्या अशा ज्या कुठल्या विचारधारेच्या निमित्ताने आपण जे जे म्हणून काही शहाणपण ऐकत असतो त्या सगळ्यात काही दुसरंच सांगितलं जात असतं आमि मग कधीतरी आपण इजिप्त किंवा भलत्याच कुठल्या देशात फिरत असतो तिथला गाइड आपल्याला तीच गोष्ट स्थानिक लोककथेत सांगितली जाते असं सांगतो. तात्पर्य माणसाला जाणवणारं शहाणपण हे सर्वत्र सारखंच असतं. सेल्फ हेल्प बुक्स हा असा सार्वत्रिक शहाणपाणाला साक्षात्कारी रूप देऊन विकाऊ बनवण्याचा बऱ्याचदा तद्दन वाटणारा प्रकार झालेला दिसतो. त्यामुळे हल्ली आपण असं काही शहाणपणाविषयी बोलावं-लिहावं तर ते एखाद्या अशा पुस्तकातून घेतलं गेलं की काय असं वाटू शकेल असा एक घोळ होऊन बसला आहे. तात्पर्य हे की मी यापुढे जे लिहिणार आहे ते कदाचित त्या चालीवरचं वाटेल .. पण मला नाटकवाला म्हणून अनेक वर्षं सातत्याने जाणवणाऱ्या काही बाबी मी इथे नमूद करू इच्छितो. 
एकंदरच माझ्या आजूबाजूच्या नाट्यकलेच्या प्रांतात मला एक सार्वत्रिक नकारात्मकता जाणवते. अं-हं, मी सध्या आजूबाजूला काय चालू आहे याबद्दल काही मांडताना जो नकारात्मक सूर बहुतांश नाटककार लावतात त्याबद्दल बोलत नाही आहे. असा नकारात्मक सूर हा त्यांच्या मतांचा भाग असेल आणि तो कलाकार म्हणून त्यांना आवश्यक वाटत असेल तर तो नक्कीच स्वागतार्ह आहे.
मी जो नकारात्मक सूर म्हणतो आहे तो नाट्यकलेच्या एकंदर व्यवहाराबाबत म्हणतो आहे. मी काही यापासून पूर्णपणे मुक्त आहे असं मी म्हणत नाही. पण मी स्वतःही हे किती वेळा करत असे आणि आता करतो याचं निरीक्षण मी सातत्याने करत आलो आहे. हे मला अगदी प्रत्यक्ष दडपणाच्या स्वरूपात स्पष्ट जाणवत असे त्या क्षणांचं उदाहरण घेऊनच सांगतो. मी मुंबईत जे काही थोडं फार नाटक केलं ते एका हौशी स्वरूपाच्या संस्थेतून. या संस्थेच्या कामकाजात प्रथम काही वर्षं आम्ही आमच्या मोठ्यांचं ऐकत असू आणि ते जे सांगतील ते काम करत असू. त्या सर्वांच्या अंगी चिकाटी हा गुण फार जोरकस होता. आम्ही भलभलत्या परिस्थितीतून तग धरून नाटक, संगीतविषयक अनेक मोठेमोठे कार्यक्रम तेव्हा राबवले पण त्या प्रत्येक वेळी कुणाकडे काही साह्य मागायला जाताना मनात एक प्रचंड धाकधूक असायची. पार्ल्यात असल्यामुळे सांस्कृतिक कामावर प्रेम करणारे आणि त्याला स्वतःहून मदतीचा हात पुढे करणारे कितीतरी आपले लोक होते. ते सगळे हक्काचे होते. पण तरीही स्मरणिकेसाठी जाहिरात मागायला जाताना, देणगी मागताना हृदयात थरकाप असायचाच. आमचे एक काका होते. अगदी हक्काचे. ते वेळेस पांच आकडी मदतही करत. त्यावेळी म्हणजे सुमारे ३०-३५ वर्षांपूर्वी पांच आकडी मदत म्हणजे बघा .. तर त्यांच्याशी फोन आधाच झालेला असायचा. आम्ही मुलं तो चेक किंवा पाकिट आणायलाच गेलेली असायचो, पण तेव्हाही मनात धाकधूक असायचीच. काहीतरी गडबड होईल का असी थेट नसली तरी ते पैसे प्रत्यक्ष हातात येईपर्यंत विश्वास बसत नसे की काही चांगलं होणार आहे. त्या काकांचीही गंमत अशी की ते छान मदत करायचे, काहीतरी खाऊ द्यायचे (हे त्यांची बायको करत असे .. त्या त्यांच्याकडे आम्ही गेलो की काहीतरी वेगळा, दाक्षिणात्य आणि खूप चविष्ट खाऊ पुढे करतच असत) तर तो खाऊ खाताना, चहा पिताना ज्या गप्पा होत त्यात हे काका आवर्जून त्यांच्या बालपणी ते कसे भिक्षा मागत मोठे झाले याचे किस्से सांगत. ॐ भवति भिक्षां मे देहि .. अशी आरोळीही ठोकून दाखवत. भिक्षा हे भिकेचं गोंडस रूप असल्याचं मला त्यावेळी आवर्जून वाटून जात असे. मला नवल वाटत असे की ते असं का नेहमी सांगतात. म्हणजे ते आता इतके मोठे झाले आहेत, आम्हाला ते आनंदानेच मदत करतात तर मग दर वेळी आम्ही भीक घ्यायला आलो आहोत अशा स्वरूपाचं हे ऐकायला मला जरा वावगंच वाटायचं .. पण बंडखोरी त्यावेळी तरी इतकी अंगात शिरली किंवा स्थिरावली नव्हती .. शिवाय गरजवंताला अक्कल नसते या चालीवर गरजवंत बंडखोर कसा असून चालेल? यावरच विश्वास जास्त होता.
असो. आपण जे काही काम करत आहोत त्याला गरज पडल्यास जे काही साह्य लागेल ते घेताना शरम किंवा लाज वाटण्यामागे आपला एक प्रकारचा मध्यमवर्गीय संस्कारही आपल्यावर सतत काम करत असतो. हे एरवी पैसे कर्जाऊ घेताना वाटणारच. पण पैशांबाबत आणि एकंदरच साधन सामुग्रीबाबत आपले मध्यमवर्गीय समज नाटकवाले म्हणूनही आपल्या सतत आडच येत राहातात हे माझं निरीक्षण आहे. मध्यमवर्गीय विचारांमधे कलाविचार बसवणं हे सरोदसाठी शिवलेल्या गवसणीमधे तंबोरा घुसवण्याचा प्रयत्न करण्यासारखं आहे.
उदाहरणार्थ नाटक करायला घेताना त्याचे कमीतकमी अमुक प्रयोग करण्यासाठी ते आपण करतो का ? आपण बऱ्याचदा पहिल्या एक दोन प्रयोगांपलिकडे त्या नाटकाचा प्रवास पाहिलेलाच नसतो. आपल्याकडे आपण सर्वसामान्यपणे “नाटक बसवतो”. मी गांवाला गुरं राखण्याचं कामही काही वेळा केलं आहे. या गुरं राखण्याच्या कामात म्हशींना पाण्यात बसवतात. मला नाटक बसवणं हा शब्द प्रयोग म्हशी बसवल्यासारखा वाटतो. नाटक आपण उभं का करू नये ? ते चालायला हवं असेल तर कमीत कमी हे व्हायला हवं की नाही ? असे बालिश प्रश्न मी स्वतःला पाडून घेतलं आहेत. मी आवर्जून हाच शब्दप्रयोग वापरत असतो. नाटक उभं राहातं, उभं राहिलं .. आता ते चालायला लागेल .. हे कसं छान वाटतं की नाही .. कधी चटकन् दुडूदुडू धावायला लागेल अशी शक्यता ही जाणवून जाते.
नाटकाच्या प्रयोगांबाबत बोलताना आपण सगळे चर्चा करत राहातो प्रेक्षक न येण्याबद्दल .. पण कितीतरी नाटकांना प्रेक्षक जातात की. कितीतरी नाटकांविषयी सोशल मीडियावर सर्वसामान्य लोकांपासून मोठमोठे कलाकार पोस्ट्स् लिहितात की .. फक्त ते आपल्या नाटकाबाबत होत नाही. आपल्या नाटकाला लोकांपर्यंत पोहोचण्याचे पंख आपण देतो का ? ज्या लोकांनी आपलं नाटक पाहायला यावं असं आपल्याला वाटतं, त्यांच्या डोळ्यांनी आपण एकदा आपलं नाटक पाहातो का ? का मग आपल्या घट्टपणात आपण आपल्या नाटकाला थिजवतो, बसवतो आणि मग प्रेक्षकांची वाट पाहात आपणही बसतो ?
“बघू काय होतं? पहिला प्रयोग तर ठरला आहे.”
“आमचं नाटक पाहायला कोणीही येत नाही”
“आज आम्ही जिंकलो. प्रेक्षागृहात रंगमंचावरच्या लोकांपेक्षा कमी लोक होते”
“लोकांना घरातून ओढून आणायचं कसं?”
असे उद्गार आपण आपल्या चहाबीडीच्या चर्चांमधे कधी गांभिर्याने तर कधी मजेशीर पध्दतीने काढत असतो. पण जास्तीत जास्त लोकांना आपण आपल्या नाटकाबद्दल सांगतो आहोत, इतरांच्या नाटकांबद्दल सांगतो आहोत, नाटक या कलेबद्दल किंवा ती महत्वाची आणि वेगळी का आहे याबद्दल सांगतो आहोत असे क्षण या चर्चांच्या तुलनेत नगण्यच असतात. हल्लीची मुले, काय त्यांची भाषा, काय त्यांचं भान अशा टीकात्म चर्चा सातत्याने झडवण्यात आपण अग्रेसर असतो, पण त्यांचा जो काही संस्कार असेल त्यातून मी माझ्या कलेसाठी माणसं उभी करीन, त्यांच्यामधे भाषिक संस्कार किंवा एकंदर कलात्मक जाणिवा विकसित व्हाव्यात अशी भूक निर्माण करीन यासाठी काही करण्यात मात्र आपली शेपूट मागे वळून नाहिशी होते. जे कोणी असं काही काम करतात त्यांच्या निर्भत्सनेत आपला वेळ मस्त जातो पण ज्यावेळी आपण त्यांना गांभिर्याने घ्यायला लागतो तेव्हा खूप उशीर झालेला असू शकतो.
आपल्या नाटकाला प्रेक्षकांसाठी आपण सिध्द करतो का? प्रेक्षकांना सामोरं जाण्यासाठी ते उभं राहिलेलं असतं का? का ते केवळ आपलंच बुजरेपण सोंगासारखं घेऊन, आपल्याला जेव्हढं म्हणायचंय तेव्हढं म्हणण्याची धडपड करत राहाणारं एक कमअसल किंवा कमी आत्मविश्वासाचं बाळ असतं ? किंवा ते थरथरत्या पायांचा एक केवळ लटपटता विचार असतं ? आपल्याला म्हणायचंय ते आपण मांडत असतोच कोणत्याही कलाप्रकारात, पण आपला सूर कोणता, कसा, कुणासाठी, कधी, का, नेमका किती, कुठे असे सर्व प्रश्न आपण पुरेसे सोडवलेले असतात का?
आपल्या कलेविषयी आपण जी भाषा वापरतो, त्यात आपल्याला आपण आपल्या कलेविषयी नक्की काय करतो आहोत याचं प्रतिबिंब दिसतं. नाटक चाललं नाही की आपण म्हणतो नाटक पडलं. आपल्याला ही प्रतिमा का आपलीशी करावीशी वाटते. आपण नाटक लाजलं, किंवा हिरमुसलं अशा स्वरूपाचे काही शब्द का नाही योजत, योजले? मी नाटक चालवणार असा आपला अहं म्हणतो. ते ही गंमतशीरच आहे. म्हणजे ते करता येईलच, पण त्यात “मी चालवत आहे” हा मुद्दा महत्वाचा होऊन बसला आहे, कलाव्यवहार म्हणून ते कितपत चालणार आहे असा मुद्दाही शिल्लक राहातो. नाटकाची आपण छापतो ती तिकिटं, प्रेक्षकांना नाटकाआधी किंवा नंतर आपण जसे सामोरो जातो, तिथे जे बोलतो त्या सगळ्यात आपली पराभूततेची मानसिकताच बव्हंशी छाप पाडताना दिसते का? असं मला अनेकदा जाणवतं.  आपलं नाटक लाजवट आहे. ते बुजऱ्या मुलासारखं पाहुण्यांसमोर डोळे वर करून बघायला लाजतं. अशी एक प्रतिमा मला बऱ्यापैकी सर्वत्र जाणवत राहाते.
या सर्वाचं कारण आपल्या एका मूलभूत समजात आहे. आपल्या मध्यमवर्गीय समजुतीप्रमाणे नाटक ही पुढे कुठेतरी जाण्याची पायरी आहे. नाटकात पैसे नसतातच आणि नाटक ही भिकारी कला आहे किंवा ती भीक मागायला लावते. छंद म्हणून काही वर्षं ठीक अशी ही कला आहे. वगैरे वगैरे असे जे काही आपले गैरसमज आहेत ते आपल्या समाजाच्या पैसा नांवाच्या बाबीमागे अंधपणे धावत सुटण्याचीच पडछाया आहे. पैसा हा इंधन असतो, चालक नव्हे हे आपल्याला अजून पुरेसं कळलेलं नाही. कर्ज घेणारा माणूस खरं तर आपला भविष्यकाळ निर्माण करत असतो. व्याज ही त्या भविष्यकाळ निर्मितीची किंमत असते. पण भविष्यकाळ चांगला असण्याची खात्री ठेवून ते घेणं यात शहाणपणा आहे हे न शिकवता आपण कर्ज घेणंच कसं चूक आहे हेच बिंबवत बसतो. आणि एवढं करून आपल्या पिढ्यान् पिढ्या घराच्या कर्जाचे हप्ते फेडत बँकांसाठी नोकऱ्या करत जन्म घालवण्यात खर्च होतात हे ही तितकंच खरं आहे. आपल्या अर्थशास्त्राच्या मर्यादित मध्यमवर्गीय आकलनामुळे नाटकातही त्यामुळे बुकिंग असणं म्हणजे नाटक चालणं अशी ढोबळ समीकरणं आपण टाळू शकत नाही. आपलं नाटक चालू लागण्यासाठी किती काळ आपल्याला त्याला प्रथम आधार द्यावा लागेल याचं कोणतंही ठोस उत्तर आपण मांडूच शकत नाही.
अशा सगळ्या प्रकारात एकंदर दैवाधीनतेकडेच आपला सर्वाचा कल मला सतत दिसतो. त्यामुळे दैवाधीनतेने मिळालेली प्रेक्षक श्रीमंतीही एकच माल विकत राहून शाबूत राखण्याचा असुरक्षिततेतला डाव आपण खेळत राहातो. वर्षानुवर्षं आपले अनेक कलाकार तोच खेळताना दिसत राहातात. हॉलिवूडच्या लोकांसाठी मग आपण देव्हारे रचतो आणि त्यांना तिथे मखरात ठेवलं की आपली जबाबदारी संपल्यासारखे परत आपला कोता किंवा तोकडा कलाव्यवहार करायला मोकळे होतो.
एकंदरीत, आपण आपल्या भाषेकडे या दृष्टीने लक्ष दिलं तरीही आपल्या कलाव्यवहारातल्या कितीतरी खुब्या आपल्याला जाणवू लागतील हा माझ्या या लेखनामागचा विचार आहे. न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग, सीक्रेट आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन या नांवांनी यातलं काही काही माझ्यापर्यंत नि तुमच्यापर्यंत येऊन गेलं आहे .. पण ते जेव्हा तसं ऐकलं तेव्हाही माझी आजी म्हणायची तो एक साधा शहाणपणाचा विचार मला आठवायचा.
मे महिन्याच्या सुट्टीत मी आजीकडेच असायचो. माझा रिझल्ट मी कधीच घेतला नाही. तो आई-दादा जाऊन घ्यायचे. एका कार्डावर लिहायचे आणि पोस्टाने तो यायचा, कारण आजीकडे फोन असण्याचा सवालच नव्हता. तर साधारण पांच मे पासून ते कार्ड येण्याची वाट मी पाहू लागायचो. प्रथम प्रथम मी म्हणायचो “काय असेल ? कार्डावर काय असेल?” तर आजी म्हणायची, “जे तू पेपरात लिहिलंयस तेच असेल” मग मी म्हणू लागले, “मी पेपर्स मस्त लिहिलेत, पण कार्डावर काय येतंय बघू” तर आजी म्हणायची, “हा पण नांवाचा जो शब्द आहे ना तो मनातलं काहीतरी उघडं पाडतो बरं का” पुढे मात्र मला माहित असायचं की कार्डावर काय आकडे असणारेत. मी ते आजीला सांगून ठेवलेले असायचे आणि तिने ते फडताळाच्या दरवाजावर कुठेतरी लिहून ठेवलेले असायचे. त्यात जितके आकडे तंतोतंत जुळायचे तेव्हढी आजी मला काहीतरी बक्षिस द्यायची.
“आंब्याचं झाड लावलं तर फणसाची अपेक्षा करता येते का? आणि फणस हवा, तर सोपं आहे, फणसाचं झाडं लावावं ..”
“आपण जी झाडं लावू त्यांची फुलं आपल्यावर पडणार ..”
“आपल्याकडे आंबराई असेल तर आंबा कुठे, कधी, कसा विकायचा हे आपल्याला कळायला हवं. नसेल कळत तर तसा माणूस आपल्याकडे हवा ..”
अशा साध्या साध्या वाक्यांमधून माझ्या जेमतेम चौथीही न शिकलेल्या आजीने मला हे बरचसं बेस्टसेलर ज्ञान आधीच देऊन ठेवलं होतं. माझ्या मनावरचा मध्यमवर्गीय पगडा फेकायचा अनिवार प्रयत्न करताना मला सातत्याने जाणवणारा झगडा हाच आहे. आपण आपल्याला पिढ्यान् पिढ्या उपलब्ध असलेला सामान्य शहाणपणा सोडून दिला आहे आणि साहेबाच्या राज्याला प्रतिक्रिया म्हणून आपल्यात शतकभरापूर्वी भिनवलेला सावधपणाच अजूनही “आपली” मूल्यव्यवस्था म्हणवून मिरवत बसलो आहोत.त्यामुळे पराभूत मानसिकतेच्या समाजाची भाषा आपल्या विचारधारेला दूषित करत सातत्याने आपल्या कलात्मक स्वप्नांचेही पंख कापतच बसते.
- प्रदीप वैद्य

Thursday, September 28

हायवे

या हायवेला पूर येतो
वेगाचा
विजिगिषेचा
माणसांच्या ऐहिक स्वप्नांचा
या देशाच्या
प्रगतीचे म्हणून जे जे
आलेख काढले जातात
त्यामध्ये हा पूर प्रकटतो
वेगवेगळ्या रेघा, स्तंभ आणि आलेखांच्या
सुबक रूपांमध्ये
मात्र
त्यात कुठेही दिसत अथवा
प्रकटत नाहीत
या हायवेवर
नित्यनियमाने
प्रकटणाऱ्या
मृत प्राण्यांच्या रक्ताच्या चिळकांड्या
लाल रंगाचे हे आलेख
फक्त हायवेवरचे जागृत प्रवासी
पाहू शकतात
एखाद्या
देशाच्या प्रगतीत तसंही
वेगपुढे मरणाऱ्यांना
स्थानच कुठे असतं ?
हायवेवर, हायवेच्या बाजूच्या जमिनीत
असंख्य
खिजगणतीत
नसलेल्या देहांच्या
चामड्याची निशाणं
फडकतात
प्रगतीचा झेंडा आणखी आणखी
उंचावत नेणाऱ्या
भरधाव वाहनांच्या वाऱ्यावर !

Wednesday, September 20

मेख

तुझ्या माफीमधेही एक छोटी मेख आहे
तुझ्या शब्दांमधे तिरक्या दिशेची फेक आहे

मला सांगायचे तुजला किती होते तरीही
तुझ्यामाझ्यामधे ही आखलेली रेघ आहे

असे खोटेखुटे जगता जरी धादांत येते
खरे असण्यातही बघ काहिसा आवेग आहे

गरज असते कुणा एका-दुजाला साहण्याची?
जगाला टाळण्यासाठी जिण्याला वेग आहे

कसे शब्दांत समजांचे विषारी बाण लपले?
कसे नाते बळी पडते इथे एकेक आहे?

जगायाला पुरे नुसतेच डोळ्यांचे किनारे
जरासे खोल तेथे भावना उद्रेक आहे

कसे?

मी ऐकत असता गाणी
तू वाऱ्यावर म्हटलेली
हरवला कुठेसा चंद्र
क्षितिजाच्या वरती खाली !

घुमणाऱ्या गाभाऱ्याचा
अस्फुटसा थर्थर ऊर
मी निरांजनाने विझलो
रात्रीच्या गर्द कुशीत !

दंवभाराने ओलेती
होता ही वेडी बाग
अरुणाचे रक्तिम डोळां
अन् कसे उतरले माझ्या ?

हे तुझेच काही कांही
माझ्या विश्वीं उमटेल
अन् नेणिवेतुनी गात्री
मी रोज असा बहरेन !

Wednesday, July 5

जीवना


जीवना वाटते तुझीच भिती
हाय माझ्या विरुद्ध तूच किती !

काय माझी मजाल सांग अता?
लीन मरणापुढ्यात तूच किती?

मी उभा राहतो पुन्हा फिरुनी
हाय मिळतोस तू धुळीस किती !

एक दूज्यास मारते दुनिया
सोबती तू तरी खराच किती?

श्वास माझा बुलंद आजवरी
पावलोपावली भितोस किती?

थांब थोडे, नको भिऊ आता
की तसेही उरून त्रास किती?

Saturday, December 3

नवा ईसीजी


काळजाचे ठोके
चुकत चुकत
नवा ईसीजी तयार झालाय
एक
अतिसंवेदनशील
सतत हलता
तीक्ष्ण
आणि
जोरात ओढलेल्या रेघांचा
ईसीजी !
तो रेकॉर्ड करता येत नाही
कारण साध्यासुध्या ईसीजीमशीनला
इतक्या जोरात सुई त्यावर फिरलेली
सहन नाही होणार
शिवाय या ईसीजीची रेघही
सतत कंपायमान
भूकंप नोंदणाऱ्या रेषेसारखी ..
ईसीजीचा कागद होऊन जाईल
अगदी चोळामोळा !
शब्दांचे कावे, योजनांमधले बारकावे
राजकीय ताल, कौटुंबिक ताण
धर्माचं स्थान, जातीचं भान
आपली ढळती पत, ज्याचं त्याचं मत
मेसेजचं व्हायब्रेशन, डेबिटचं नोटिफिकेशन
ब्लडचं प्रेशर, कोणाचं फ्रेंडली जेश्चर
ट्रॅफिक जॅम, फोनची रॅम
जिथेतिथे रांग, यशाची सारखीच टांग
दुकानांची झगमग, दुपारची वाढती भकभक
कर्जाचे डोंगर, खर्चांचे लोंगर
लिपिड प्रोफाइल, लाईफस्टाइल

टीव्हीवर दिसणारी कचकडी नृत्यं
ओळखीतल्या लोकांची आगळीवेगळी कृत्यं
सुमार गोष्टींचा गवगवा
फुफुसातली हवाबिवा

सगळंच जातंय नोंदवलं
रेकॉर्ड न होऊ शकणाऱ्या
या ईसीजीमध्ये
हृदय कसंबसं का होईना
चालत राहिलंय
याचं बरं वाटत राहील
पण
काहीतरी फाटत राहील
आतमध्ये
खोलखोल
सतत
कुठेही रेकॉर्ड न होता !

Sunday, August 28

ही छाती फुटेल की काय ?


माझा देश हा ‘माझी छाती फुटेल की काय?’ या प्रश्नाचं कारण होऊन बसला आहे.

मला थक्क करणाऱ्या कितीतरी नवनव्या प्रथांमुळे एकीकडे मी अवाक् होत असलो, तरी विलक्षण आश्चर्यचकित मानसिक स्थितीमधून मला अतिशय अपूर्व वाटत आहे. ज्या ज्या प्रथा, ज्या ज्या रितीभातींची कशाशीही तुलना होऊ शकत नाही त्यांच्याबद्दल ; त्या केवळ या देशातच निर्माण होऊ शकतात, पोसल्या जाऊ शकतात याबद्दल; माझी मनोमन खात्री पटत जाते आहे. आता असं अतुलनीय काही फक्त याच देशात सापडणारं असेल तर त्याबद्दल अभिमानाने इथली कोणतीही छाती फुगू लागली पाहिजे ही मला पटू लागलं आहे. पण अशी जर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल छाती फुगवून घेऊ लागलो तर ही माझी टीचभर करंटी छाती फुटेल की काय अशीच माझी परिस्थिती हाऊन बसली आहे. हे म्हणजे अगदी देणाराचे हात हजारो दुबळी माझी झोळी असं होऊन बसलं आहे. याबद्दलही मला अपूर्व वाटत आहे. थोर थोर व्यक्तींच्या आयुष्यात असा योग आल्याच्या त्यांच्या मुलाखती टीव्हीवरून पाहात असताना मला जे खुजं वाटत असे त्याचं काहीच कारण नाही हे ही मला कळून चुकलं आहे. आता चक्क माझ्याही आयुष्यात माझ्या स्वतःच्या देशानेच ही स्थिती, हा कृतकृत्य करणारा अनुभव आणून ठेवला आहे.

किती भन्नाट देश आहे माझा ! ... आणि आजची त्याची स्थिती !!

ज्या देशात प्रत्येकालाच जणू काही काहीतरी जिंकल्याची; काहीतरी जबरदस्त होत असल्याची; एक प्रकारची संपन्नता केवळ आपल्या अवतीभवती नांदत असल्याची; सतत, सेकंदा-सेकंदाला ठाम खात्रीयुक्त जाणीव असेल असा एकही देश या पृथ्वीतलावर नसेल. अगदी जगावर राज्य करण्याचा कांगावा करणाऱ्या अमेरिकेतही लोक इतके सुखी नाहीत. खरं तर लोक सुखी किती आहेत हे पाहाण्याचे वेगवेगळे निर्देशांक हे ही त्या कांगावखोर देशाच्या कारस्थानाचाच एक भाग असणार. आता त्या कर्मदरिद्री अमेरिका देशात संपूर्ण वर्षात केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच सण-उत्सव असतील. त्यातलाही सार्वत्रिक म्हणावा असा एकच. पण माझ्या या देशात पाहा. वर्षातल्या एखाद्या महिन्यात इथे वाजंत्री वाजतच नाहीत असं कधीच शक्य नाही. किंबहुना परंपरागत वाजंत्री वाजवण्याचे क्षण तर आहेतच त्यात आता भर पडत चालली आहे. पूर्वी फक्त एकेका घराच्या अंगणात होणारे हे सण, उत्सव आता सर्व समाज साजरे करू लागला आहे.

इथे सतत सण असणार, उत्सव असणार. खरं तर फक्त हिंदूंचेच नव्हे तर इतर धर्मांचेही ! पण हिंदू धर्माच्या सणांची काय शान आहे ! काय तो दिमाख ! अहाहा ! काय ती दृश्यं ! विजयनगर ह्या प्राचीन नगरीच्या वर्णनांमधे अरबी आणि इतर परदेशी व्यापाऱ्यांनी लिहून ठेवलेली वर्णंनंही खुजी वाटावीत अशी समृध्दता ह्या सणांमधून, उत्सवांमधून नुसती ओसंडून वाहात असते. ह्याशिवाय त्या नालायक इंग्रजाचं दैव बलवत्तर असल्याने त्याला जी या भूमीवर राज्य करण्याची संधी मिळाली, आणि त्यानंतर ग्रह पालटल्यावर निघूनही जावं लागलं, त्या इंग्रजाने आणखी दोन तीन सण माझ्या या देशाला बहाल केले. तो गेल्यानंतर गेल्या सत्तर वर्षांमधे ह्या अशा उत्सवी दिवसांमधे वृध्दीच होत जात आहे. लोकशाही सरकारांनी आम्हा जनतेवर केलेल्या कृपेमुळेच हे शक्य झालं आहे, त्याचा एक वेगळाच अभिमान छातीमधे तग धरू लागला आहे तो वेगळाच.

राजकीयच कशाला, सामाजिक आणि आर्थिक वाटचालीत आमच्या देशाने कितीतरी उत्सव पारंपरिक स्वरूपात असतात त्यापेक्षा किती समृध्द स्वरूपात आणि कसे साजरे करता येतात याची असंख्य उदाहरणं खरंतर जगाला घालून दिली आहेत. ते जे वर्ल्ड रेकॉर्ड्सचे ग्रंथ वगैरे काढून पोट भरणारे क्षूद्र काही लोक आहेत त्यांना भारताच्या केवळ ह्या एका क्षेत्रातल्या प्रगतीवर ग्रंथ काढण्यास हा जन्मही पुरणार नाही इतके जागतिक उच्चांक ह्या क्षेत्रात तयार झाले असणारच. अर्थात् हे “वर्ल्ड वर्ल्ड” असं म्हणत जे केलं जातं ते सगळं त्या अमेरिकन कांगाव्याचाच भाग असल्याने हे क्षूद्र ग्रंथकार ह्या कशाचीही साधी दखलही घेत नाहीत. पण क्रिकेटसारख्या खेळाला केवळ आपलंसं करून त्या इंग्रजावर जे उपकार माझ्या देशाने केले आहेत ते त्याने इथे रेल्वे आणून केले असतील त्यापेक्षा कितीतरी पट जास्त आहेत. म्हणजे बघा ना, रेल्वे काय हो, माझा देश गरीब असतानाही काही आफ्रिकन देशांमधे घेऊन गेला होता हे मला सांगितलं गेलंय. पण एखाद्या देशाचा केवळ एखादा खेळ असा पूर्णपणे आपलासा करून घ्यायचा. नंतर त्याच्यात इतकी आर्थिक उन्नती करत जायची की तो खेळ केवळ या नव्या देशाने निर्माण केलेल्या नव्या आर्थिक समीकरणांवरच पोसला जावा ? अहो हे इतर कुठल्या खेळाबाबत कोणीही करून दाखवलं आहे का ? उदाहारणार्थ भारत सोडताना आम्ही आणलेल्या इंग्रजी शिक्षण वगैरे गोष्टींमुळे तुमच्या मुली “भोंडला” हा खेळ कदाचित सोडतील तर तो आम्ही खेळू लागतो असं करून दाखवण्याची इंग्रजाची शामतच नाही. हीच नाही तर उद्या भोंडला ऑलिंपिक्सचा भाग करून दाखवण्याची तर बातच सोडा.

पण माझ्या देशाला या परावलंबित्वाची गरजच काय ? आता बघा ना ... आयपीएल नांवाचा जो आधुनिक सण माझ्या देशाने निर्माण केलाय तो तर ऐन परिक्षांच्या मोसमात येत असूनही फार जंगी साजरा केला जातो.

या देशात जन्माणाऱ्या मुलामुलींना कसलंही भय नाही. याची खात्री गृहित धरणारंच हे वातावरण आहे. इथली समृध्द माती, परंपरा, देव, दैवीपणा, तीर्थस्थळं या सगळ्यांमुळे इथे माणसंही भन्नाट निर्माण होत चालली आहेत. दहीहंडीच्या सर्व नऊ-दहा थरांच्या वर चढणाऱ्या बाल-गोविंदाला तो साक्षात श्रीकृष्णाचा प्रतिनिधी असल्याने कसलाच धोका नाही आणि त्याला वज्रबाहुत्वाचं वरदान मिळेल, प्रसंगी ही माती त्याला अलगद झेलेल ही खात्री इथल्या प्रत्येकाच्या मनात असल्याखेरीज हा सण शक्य आहे का सांगा. खरंतर धर्माच्या अधिष्ठानामुळे माझ्या आजूबाजूला किती अचाट गोष्टी लोक सहजि करत चालले आहेत ह्या एका साक्षात्कारानेही मी स्तंभित आणि स्तीमित होत चाललो आहे. माझी छाती अभिमानाने फुलवणाऱ्या गोष्टीत ह्या एका बाबीची भर टाकायला हरकतच नाही.
जवळपास प्रत्येकाला एक आध्यात्मिक गुरू आहे. त्याचे काही सण प्रत्येकाच्या पोतडीत वेगळेच. ह्या गुरूंनी भरलेल्या देशात काही वर्षांनी गुरूपौर्णिमेला राष्ट्रीय उत्सावाचं महत्वा द्यावं लागेल याची मला खात्रीच आहे. आपले नवे पंतप्रधान ह्या उत्साहात स्वच्छता, योग आणि असा प्रकारच्या इतर दिवसांची अनन्यसाधारण भर टाकत आहेत ते वेगळंच. अशा अर्थी कचरा काढण्याचाही सण केला जाऊ शकतो अशी नवी मांडणी हा माझा देशच करू लागला आहे.

आपल्या प्रत्येक कृतीला धार्मिक अधिष्ठान पाहिजे हे इथल्या नव्या दमाच्या राज्यकर्त्यांनाही पटलं आहे. विविध सणावारांच्या सार्वजनिक होण्यातून समाज संघटित होत जातो आणि म्हणूनच समाजाला जराही असंघटित वाटू नये यासाठी दर महिन्यात किंवा ठराविक वारंवारितेने काही ना काही धार्मिक घडवण्याच्या अनुष्ठानात ते मग्न होत चालले आहेत. अमेरिकेत त्या भारतियांच्या विरूध्द म्हटल्या जाणाऱ्या डोनाल्ड ट्रंपच्या विरूध्द नुसती भाषणं करून त्या हिलरीला जे तुटपुंजं यश मिळेल त्यापेक्षा कितीतरी यश हे इथल्या अगदी छोट्यात छोट्या नगरांच्या नगरसेविकाही चैत्रात-श्रावणात मेंदी काढण्याचे कॅम्प आयोजित करून साधतात. आता मेंदी काढायला चार-पांचशे बायका येणार तर मग नृत्य-गान नको का?

संपूर्ण युरोप अमेरिकेत रॉक आणि पॉप ‘कॉन्सर्ट्स्’ना दिसणार नाही इतकी झगमग ह्या उत्सवांमधे इथे दिसते. विवध प्रकारचे, विविध आकारांचे झोत टाकणारे किंवा लोळ फेकणारे दिवे, ते एखाद्या टेंपोवरही लावता यावेत यासाठी छोटे जनरेटर्स आणि मोठ्या रोषणाईसाठी कितीतरी मोठे जनरेटर्स, देखावे ओढणाऱ्या गाड्या, लेझीम ढोल पथकांमधे झालेली लक्षणीय वाढ, त्यांची रोज संध्याकाळी चालणारी प्रॅक्टिस सेशन्स .. अहाहा काय ती दृश्यं !! माझ्या पुणे शहराच्या नदीकाठच्या रसत्यालगत दर पन्नास फुटावर एक ढोलपथक तालीम करताना दिसतं. संध्याकाळी हा काठ नुसता फुलून जातो. ह्या देशात ही समृध्दता इथले कानही समृध्द करते. मुर्दाड कानांना ८० डेसीबेल्सच्या वरचे आवाज सहन होत नाहीत. पण या इथले कान दिवसेंदिवस, ह्या सर्व उत्सवी वातावरणातून “दिव्य कान” होत चालले आहेत. नव्हे, ते यामुळेच दिव्य होत जातील अशी खात्री मला आता वाटू लागली आहे.

कान कणखर, सणांमधे जेवून पोटं कणखर, ढोल-पालख्या नाचवून पाठीचे कणे कणखर, झाडापानांच्या सणांमुळे निसर्ग कणखर अशी इथल्या सर्वांची प्रकृतीही विलक्षण सुधारणार आहे यात शंका नाही. परवा एका मित्राने ज्ञानात भर टाकली की कुंभमेळ्यातले साधू जे विलक्षण खेळ आणि क्रीडाप्रकार करून दाखवतात ते ऑलिम्पियन्सच्या बापजाद्यांना केवळ स्वप्नांत खेळणंही शक्य नाही. असं म्हणून त्याने कुंभमेळ्यातील साधू स्वतःच्या लिंगाने चक्क एक गाडी ओढत असल्याचं दाखवलं. मी शाळेत असतानाचे कुंभमेळ्यातले साधूही इतके उत्साहाने काही करून दाखवणारे नव्हते. किंबहुना त्यांना तेव्हढं उत्साही किंवा उत्सवी वाटण्यासारखंच नसेल तेव्हा काही. इथेही धर्माचं अधिष्ठान आलंच. पण तेच फक्त उपयोगी नाही. मानसिक स्थिती उत्साहवर्धक आणि उत्सवी असल्याखेरीज इतकं ऊर्जावाहित्व येणार कुठून ?

माझा आणखी एक मित्र सध्या एका कामात गुंतला आहे. त्याने मला सांगितलं की तसंही गणपतीचे मांडव दहीहंडीलाच घातलं जातात. तर त्यांचा वापर मंडळांना करता यावा आणि दहिहंडीच्या उत्सवालाही एक विशेष वैज्ञानिक धार मिळावी म्हणून तो कार्यरत आहे. त्याची कंपनी सध्या एक पोर्टेबल फाइव्ह डी शो विकसित करत आहे. त्या शोची अशी कल्पना आहे की खरीखुरी दहीहंडी काही प्रत्येकालाच खेळता येत नाही त्यामुळे प्रत्येकजण आनंदाला मुकतो. हे त्या उंच बांधलेल्या दहिहंडीतून प्रत्येकाच्या आनंदावर पडणारं विरजण यापुढे पडणार नाही किंवा पडलंच तरी त्यामुळे नव्या आनंदाचं उत्तम दही, ताक, लोणी अशी क्रमवारी साधता येईल असं तो ठामपणे सांगू लागला. ते असं करणार आहेत की तो शो त्या दहिहंडीच्या शेजारच्या मांडवात असेल. आपण तिकिट काढून आत जायचं. कृष्णाचे कपडे आपल्याला दिले जातील ते घालायचे आणि मग शो सुरू. थ्री डी ग्राफिक्सच्या आणि मोशन सेन्सिंग तंत्रज्ञानाची त्याच्याशी सांगड घालत तिकिट काढून तात्पुरते कृष्ण झालेल्या आपल्यापैकी प्रत्येकाला एका महाप्रचंड दहीहंडीच्या अगदी वरच्या थरात पोहोचणं, हंडी फोडणं असे आनंदच नव्हे तर चक्क त्या हंडीतलं पाणी आपल्या अंगावर पडण्याचा प्रत्यक्ष सानुभव आनंदही घेता येईल. असाच प्रकारचे भन्नाट थ्रीडी फोर डी आणि फाइव्ह डी देखावे आगामी गणेशोत्सवातही मौज आणतील हा विश्वास त्याला वाटतो.

विज्ञानाची आपल्या धर्माशी आणि उत्सवांशी सांगड घालणाऱ्या ह्या माझ्या देशात लेसर, डॉल्बी, डीजे असा शब्दांनी नवे आयाम प्रस्थापित केले आहेत आणि ते इतर कोणत्याही देशामधे शक्य झालेलं नाही. आपल्या एखाद्या देवाच्या केवळ विसर्जनासाठी तीन तीन दिवस रांगा लावून तेव्हढ्याच उत्साहात कोणताही देश नाचू शकत नाही. फेसबुकवर-व्हॉट्सॅपवर उत्साहवर्धक पोस्ट्स् टाकणं, गाडी घेणं, नवनवे फोन घेणं, ते बदलणं, कपड्यांपासून सर्वकाही क्लिक् करून मिळवणं, किटी पार्टी, भिशी, रमी, रम असे नवेनवे सण-उत्सव तर आहेतच. ते ह्या सगळ्यात तंत्रज्ञानाला हाताशी घेऊनच साजरे होतात.

नाक्यानाक्यावर रिक्शावाल्यांच्या, मालवाहतूकदारांच्या, व्यापाऱ्यांच्या एकत्रित सत्यनारायण पूजा, खंडेनवमी, लक्ष्मीपूजनं अशा नव्या सार्वजनिक सणा-उत्सवांना नवी ऊर्मी प्राप्त होत आहे. गांवागांवातले गांवदेवांचे उत्सव पैशांच्या झळाळीने दिमाखदार होत चालले आहेत. पूर्वीप्रमाणे राष्ट्रीय दुखवटे पाळणं आपण सोडून दिलं आहे. सणांच्या सुट्यांमधे मात्र वाढ झाली आहे. प्रत्येक सणासुदीच्या निमित्ताने सिरियलींमधे नवी वाक्यं लिहिली जाणं ते स्पेशल एपिसोडची रचना होणं, किंवा प्रत्येक इदेला, दिवाळीला किंवा तत्सम सणाला आपला सिनेमा येणारच असं ब्रॅन्डिंग सिनेतारकांनी करणं हे आपल्या देशात तग धरून वाढू लागलं आहे. लोक त्याकडे मुद्दाम पाहू लागले आहेत. अलिकडे आपण इंग्रजी कॅलेंडर वापरतो पण अगदी भारतीय पंचांगांचा विचार केला तरीही चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच ते फाल्गुन पौर्णिमा आणि रंगपंचमी पर्यंत सणांचा, उत्सवांचा तुटवडा नव्हताच. पूर्वी ह्या सणांच्या अधूनमधून शेतीची कामं माणसं करीत असत पण आता शेतीच नसल्याने आणि प्रत्येकाच्या पाकिटात पैशाचं पीक पूर्वीपेक्षा उत्तम येत असल्याने हे सर्व होत असावं असा माझ्या अपरिपक्व मनाने विचार केला होता. पण ते खरं नाही.

खरं हेच आहे की कोणत्यातरी विलक्षण, अनाकलनीय ऊर्जेने माझ्या या देशाला भारून टाकलं आहे. पूर्वी हरलेल्यालाही आपण जिंकतच चाललो आहोत असं वाटू लागलं आहे. आपण काही यापुढे कधीच हरणार नाही असं प्रत्येकालाच पटलेलं आहे. छोट्या छोट्या लढाया तर माणूस जिंकतोच आहे. मोठ्या लढाया होत नाहीच्चेत.

प्रत्येकाला केस पांढरे झाल्याने हरल्याचं वाटायची, आपण काळे आहोत म्हणून जिंकत नाही असं वाटण्याची, आपले कपडे सफेद नाहीत, केस मुलायम नाहीत, कपडे मुलायम नाहीत, अंग तुकतुकीत नाही या कश्शा कश्शानेच काहीच होत नाही. प्रत्येक गोष्टीवर काहीतरी उपाय आता आहेतच.

अजून खरं तर अमरत्व माणसाला मिळालेलं नाही, पण अमरत्वाचा वर मिळालेला एखादा ययाति जसा उत्साहाने भरून गेला असेल तसा माझा देश भारला गेला आहे.

माझी छाती मात्र हा सर्व उत्साह तिच्यात सामावून घ्यायला असमर्थ होत चालली आहे. दडपत चालली आहे. उद्या जर का माझी छाती फुटल्याचं तुम्हा कोणाच्या कानावर आलं तर ते या माझ्या देशाच्या या “नव नवल नयनोत्सवामुळे” किंवा नवोन्मेषी-नवोत्सवी वातावरणाच्या उत्साहातून आणि त्याबद्दलच्या मला वाटत चाललेल्या विस्मयजनक अभिमानातूनच झालं आहे याची सर्वांनी खात्री बाळगावी.