'पीडीए'चं शिबिर पुन्हा सुरु झालं. वर्षातून एकदाच येणारं हे शिबिर सुरु होणे, हा एक विलक्षण आनंदाचा क्षण असतो. या वर्षी शिबिरात २३ जण आहेत. 'पीडीए'चं शिबिर, त्यातली शिस्त, काटेकोरपणा आणि मज्जा यांचं एक भन्नाट मिश्रण हे कोणालाही नंतर कधीच विसरता येत नाही. १८ वर्ष झाली या शिबिराला ... अभ्यासक्रमात यथायोग्य बदल करत, नव्या-नव्या आव्हानांना तोंड देत हे शिबिर दर वर्षी उत्तम प्रकारे चालवलं जातंच आहे...
भालबा केळकर आम्हाला कुणालाच भेटलेलेही नाही. पण त्यांच्या या संस्थेचं हे शिबिर आता आम्ही चालवतो आहोत. शिबिरातून सहभागी कलाकारांच्या जाणिवा समृद्ध होणं हे तरी नक्की होत आलं आहे.
'पीडीए'ला या शिबिरातूनच नवे कलाकार मिळतात आणि म्हणूनच आज 'पीडीए' पुन्हा जोमाने कामाला लागली आहे.
सहस्रचन्द्रदर्शन हे स्वतंत्र दोन अंकी नाटक आणि अचलायतन हे रविन्द्रनाथांचं नाटक यांची निर्मिती आणि यश हे दोन्हीही या नव्या कलाकारांनीच साध्य केलं आहे.
भालबा, डॉ. श्रीराम लागू यांनी स्थापना केलेलं हे स्वप्न किंवा तत्सम काहीतरी आज आम्हाला त्यात सामावून घेतं आहे आणि त्यातच अनेकांची स्वप्न साकार होताहेत, येऊन मिळताहेत हे नक्कीच सुखावह आहे !